सोलापूर दि. १४ : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०१ मधून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष भीमराव शिंदे यांच्या वतीने रुपाभवानी गार्डन येथे प्रभागातील कार्यकर्ते व नागरिकांचा मेळावा व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास प्रभागातील शेकडो नागरिक बांधुभगिनी उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “संविधान बदलण्यासाठी ‘चारशे पार’ बहुमत द्या, असा नारा देणाऱ्या भाजपला संविधानप्रेमी जनतेने त्यांची जागा दाखवत केवळ २४० जागांवर आणून ठेवले. शेवटी नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्यांवर केंद्रात सरकार स्थापन करावे लागले,” म्हणुनच महाराष्ट्रात वोट चोरी करावी लागली. असा घणाघात त्यांनी केला.
“काँग्रेस पक्ष कधीही भारतीय संविधान बदलू देणार नाही. संविधान, लोकशाही आणि सर्वसामान्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढत राहील,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
*महानगरपालिका निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवरच* चेतन नरोटे म्हणाले की, सोलापूर महानगरपालिका निवडणूक ही धर्म किंवा जातीपातीच्या आधारावर न होता शहराच्या मूलभूत प्रश्नांवर झाली पाहिजे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, नालेसफाई, पालिका रुग्णालयांची अवस्था, शाळांमधील अव्यवस्था, गटारांचे प्रश्न, महिलांसाठी अपुरी व अस्वच्छ शौचालये, फुटपाथांची दुर्दशा, खड्ड्यांमुळे होणारे अपघात, वाढता ट्राफिक, कचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेली बोगस कामे — या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
*भाजपच्या कारभारावर टीका* २०१७ मध्ये केंद्र व राज्यात सत्ता असल्याने सोलापूर महानगरपालिकेची सत्ता भाजपकडे दिली; मात्र जनतेला केवळ निराशाच पदरी पडली, असा आरोप त्यांनी केला. “३६५ दिवसाचा कर भरूनही पाच ते सहा दिवसाआड तेही रात्री अपरात्री पाणी मिळते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली फसवणूक झाली, बोगस बिले काढली गेली. युवकांना रोजगार, उड्डाणपूल, विकास कुठे दिसत नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
*काँग्रेस–महाविकास आघाडीचा निर्धार* खासदार प्रणिती शिंदे या सातत्याने जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत असल्याने त्यांना ट्रोल केले जाते, अशी खंत व्यक्त करत काँग्रेसचा हात हा गरिबांची साथ असल्याचे त्यांनी सांगितले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विचारधारेनुसार काँग्रेसची नाळ गोरगरिब, दिन दलित, वंचिताशी जोडलेली असल्याचेही त्यांनी नमूद केले.येणारी सोलापूर महानगरपालिका निवडणूक महत्त्वाची असून महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवून भाजपला पराभूत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्याचे संकेत त्यांनी दिले.
*भीमराव शिंदे यांच्या उमेदवारीचा पक्ष नक्कीच विचार करेल* मेळाव्यात भीमराव शिंदे यांच्या महापालिकेतील अनुभवाचा उल्लेख करण्यात आला. महापालिकेच्या कामकाजाची सखोल माहिती असून त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ०१ मध्ये अनेक कामे मार्गी लागत आहेत. येत्या निवडणुकीत प्रभाग ०१ मधून त्यांच्या उमेदवारीचा विचार काँग्रेस पक्ष निश्चितपणे करेल, असे सांगितले.
यावेळी ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, ज्येष्ठ नेते विश्वनाथ साबळे, प्रवक्ते सेलचे जिल्हा अध्यक्ष नागनाथ कदम, सरचिटणीस अँड केशव इंगळे, नगरसेवक N K क्षीरसागर, सेवादलाचे प्रदेश सरचिटणीस अशोक कलशेट्टी, ज्येष्ठ नेते मधुकर इंगळे, तिरुपती परकीपंडला, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, सिद्धू अण्णा मैंदर्गीकर, चिंटू कांबळे, सचिन सुरवसे, आकाश वाघमारे, आशिष दिलपाक, साहिल शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
