सोलापूर, दि.8 : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने मानवतावादी पुढाकार घेत पाच लाख रुपयांचा मदतनिधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना हा धनादेश प्रदान केला.
विद्यापीठाच्या विद्यार्थी, अध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच संलग्नित महाविद्यालयांच्या सहभागातून हा निधी जमा करण्यात आला. अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांच्या पुनर्वसनासाठी आणि मदतीसाठी हा निधी उपयुक्त ठरणार असल्याचे कुलगुरू डॉ. महानवर यांनी सांगितले.
धनादेश सुपूर्दगी प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, पद्मजादेवी मोहिते-पाटील, प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. सचिन गायकवाड, एम. डी. कमळे, डॉ. सुशील शिंदे, डॉ. प्रशांत पवार, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या मदतनिधीसाठी विद्यापीठ आणि सहभागी सर्वांचे आभार मानले. समाजहिताच्या कार्यात शिक्षण संस्थांनी पुढाकार घेणे ही समाजाबद्दलची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेती, घरांची मालमत्ता व पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विविध संस्था, संघटना आणि नागरिकांकडून मदतकार्य सुरू आहे. अशा स्थितीत सोलापूर विद्यापीठाने दिलेली ही मदत पुनर्वसन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा हातभार ठरणार आहे.
