सोलापूर दि. 12 : भारत निवडणूक आयोग तसेच राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रियेची पारदर्शकता, गोपनीयता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान केंद्रांमध्ये मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन व वायरलेस फोन वापरण्यावर सक्त निर्बंध घालण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न झाल्यास मतदान केंद्रांवर वाद निर्माण होण्याची तसेच मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करून व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सर्व संबंधितांनी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. 464/INST/EPS/2025/L&O दिनांक 23 मे 2025 तसेच राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 26 जून 2025 चे निर्देश लक्षात घेऊन खालील नियम लागू करण्यात आले आहेत.
महत्वाचे नियम व तरतुदी : मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल फोन नेण्यास पूर्णतः बंदी आहे.
मतदान केंद्राच्या 100 मीटर परिघात तसेच मतदान केंद्र परिसरात कर्मचारीवृंद व पोलीस यांच्याव्यतिरिक्त कोणालाही मोबाईल / कॉर्डलेस / वायरलेस फोन वापरण्यास मनाई आहे.
वृद्ध, अपंग, दिव्यांग अथवा विविक्षित मतदारांनी जर 100 मीटर परिघात मोबाईल फोन आणला असेल, तर तो मोबाईल पूर्णतः बंद (Switched Off) ठेवून मतदान केंद्राच्या आत प्रवेश करण्यापूर्वी बाहेर त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे.
संबंधित महानगरपालिका आयुक्त / जिल्हाधिकारी / निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीनुसार मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये किंवा मुख्यतः मतदान केंद्राबाहेर “मोबाईल फोन जमा कक्ष” स्थापन करावा. सदर कक्षावर ठळक अक्षरात “मोबाईल फोन जमा कक्ष” असा फलक लावण्यात यावा व कक्ष चालविण्यासाठी विश्वासू स्वयंसेवकांची नियुक्ती करावी.
मोबाईल जमा करण्यासाठी किमान 10 कप्पे असलेला पीजन होल बॉक्स उपलब्ध करून देण्यात यावा. सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असून, मोबाईल जमा करताना व परत घेताना तसेच मोबाईल ठेवलेल्या ठिकाणाचे चित्रीकरण होणे आवश्यक आहे. कक्षामध्ये प्राधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे व मतदान केंद्राच्या शिक्क्याचे क्रमांकित टोकन उपलब्ध ठेवण्यात यावेत.
मतदाराने मोबाईल बंद करून जमा केल्यानंतर त्याचा मोबाईल संबंधित पीजन होलमध्ये ठेवून त्याच क्रमांकाचे टोकन मतदाराला देण्यात येईल. मतदान करून आल्यानंतर मतदाराने सदर टोकन जमा करणे आवश्यक आहे. टोकन जमा केल्यानंतर त्या क्रमांकाचा मोबाईल फोन मतदारास परत देण्यात येईल व टोकन पुन्हा त्याच क्रमांकाच्या पीजन होलमध्ये ठेवण्यात येईल.
स्थानिक परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था, स्वयंसेवकांची उपलब्धता आदी बाबी विचारात घेऊन मोबाईल जमा कक्ष स्थापन करावा किंवा नाही, याबाबत अंतिम निर्णय संबंधित प्राधिकृत अधिकारी घेऊ शकतात.
उमेदवार, राजकीय पक्ष व नागरिकांसाठी आवाहन :सर्व उमेदवार, राजकीय पक्ष, त्यांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी या नियमांची माहिती करून घेणे व ती पुढे पोहोचविणे आवश्यक आहे. यासंदर्भात मतदार जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा मतदान केंद्रांवर अनावश्यक वाद, गैरसमज व कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. तसेच मतदान करतानाचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल होणे ही गंभीर बाब असून, ती निवडणूक नियमांचे उल्लंघन ठरते.
मतदान ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया असून, तिची गोपनीयता व शिस्त राखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
