सोलापूर, दि. ७ – महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोळाव्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा ‘उत्कर्ष’ महोत्सव २०२५–२६ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावून घवघवीत यश संपादन केले. या महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उपविजेतेपद, तर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
बुधवारी झालेल्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभात मुंबईचे प्रसिद्ध लोककवी प्रा. प्रशांत मोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रभाकर कोळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सी.ए. महादेव खराडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. वीरभद्र दंडे, आर. डी. कदम, बार्शी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी महोत्सवातील चार दिवसांच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला.
सोलापूर विद्यापीठाच्या संघाने नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य व छायाचित्रण या विभागांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले. ललित कला विभागाचे विजेतेपद महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी मिळविले. उत्कृष्ट संघनायक म्हणून पुणे विद्यापीठाचे डॉ. अमित गोगावले आणि सोलापूर विद्यापीठाच्या प्रा. पल्लवी भोजने यांचा गौरव करण्यात आला. ‘गोल्डन बॉय’ व ‘गोल्डन गर्ल’ हा मान सोलापूर विद्यापीठातील विक्रम कांबळे व प्रेरणा गायकवाड यांनी पटकावला. शिस्तप्रिय संघ म्हणून गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी लोककला ही जीवन जगण्याची प्रेरणा असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे मनापासून कौतुक केले. त्यांनी यावेळी विविध कविता सादर करून प्रेक्षकांची मन जिंकले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी लोककला हे समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन असून आजचे विद्यार्थी कलाकार ही परंपरा समर्थपणे पुढे नेत असल्याचे नमूद केले. तसेच लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक तरुणाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धांच्या निकालाचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे व डॉ. ममता बोल्ली यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. वीरभद्र दंडे यांनी मानले.
