सोलापूर दि. 21 : शहरालगत असलेल्या बोरामणीत भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह सापडला आहे. यामुळे मातीत दडलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन ठसा उजेडात आला असून याचे रोमन कनेक्शन समोर आले.
सापडलेल्या या चक्रव्यूह रचनांनी महाराष्ट्राच्या भूमीखाली दडलेली जागतिक व्यापाराची कथा पुन्हा एकदा जिवंत केली आहे. रोमशी असलेल्या व्यापाराशी हा संबंध दर्शवतो.
महाराष्ट्राच्या भूमीत दडलेला दोन हजार वर्षांचा इतिहास (Ancient History) पुन्हा एकदा समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावातील संरक्षित गवताळ प्रदेशात भारतामधील आतापर्यंतची सर्वात मोठी वर्तुळाकार दगडी चक्रव्यूह रचना (Stone Labyrinth) सापडली आहे. या ऐतिहासिक शोधाने पुरातत्व जगतात खळबळ उडवून दिली आहे. तब्बल 50 फूट बाय 50 फूट व्यासाची आणि 15 सर्किट असलेली ही वर्तुळाकार दगडी रचना भारतात आजवर सापडलेली सर्वात मोठी चक्रव्यूह रचना ठरली आहे.
याआधी भारतात नोंदवलेल्या वर्तुळाकार चक्रव्यूहांमध्ये जास्तीत जास्त 11 सर्किटचीच रचना आढळली होती.चक्रव्यूह रचना लहान दगडी गोट्यांपासून तयार करण्यात आली असून, तिच्या कड्यांमध्ये मातीचा स्वतंत्र थर आढळतो. हा थर आजूबाजूच्या जमिनीपेक्षा सुमारे 1 ते 1.5 इंच उंच असल्याने, ही रचना शतकानुशतके कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय अबाधित राहिल्याचे स्पष्ट होते.
बोरामणी गवताळ सफारी अभयारण्यात पाहणी करत असताना नेचर कन्झर्वेशन सर्कल, सोलापूरच्या सदस्यांना ही रचना प्रथम दिसून आली. पप्पू जमादार, नितीन अन्वेकर, धनंजय काकडे, भरत छेडा, आदित्य झिंगाडे आणि सचिन सावंत यांच्या पथकाने पुरातत्वीय महत्त्व ओळखून त्वरित तज्ज्ञांशी संपर्क साधला.
स्थानिक भाषेत या चक्रव्यूहांना ‘कोडे’ म्हटले जाते. विविध संस्कृतींमध्ये त्यांना चक्रव्यूह, मनचक्र, यमद्वार अशी नावे आहेत. नेव्हिगेशनशिवाय या रचना ध्यान, मातृसत्ताक प्रजनन शक्ती आणि आध्यात्मिक साधनेशी जोडल्या गेल्याचेही अभ्यासक सांगतात
