सोलापूर, दि.20 : भारताच्या इतिहासात अनेक व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा दिली आहे. त्यात शौर्य, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारे शीखांचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांचे स्थान विशेष आहे. त्यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने महाराष्ट्र शासनाने राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन केले आहे. नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमांद्वारे त्यांच्या कार्याचा परिचय जनतेला करून देण्यात येणार आहे.
नागपूर मध्ये हा कार्यक्रम झालेला असून नांदेड येथे दिनांक २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी हा कार्यक्रम होत आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी : गुरु तेगबहादुर साहिबजी हे सहावे शीखगुरू हरगोविंद यांचे पुत्र आणि दहावे गुरू गोविंदसिंह यांचे पिता होते. त्यांचा जन्म अमृतसर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना वैराग्याची ओढ होती. पुढे १६६४ मध्ये त्यांना नववे गुरू म्हणून गादीवर बसविण्यात आले. त्यांनी शिवालिक पर्वतराजीत आनंदपूर नगर वसवून धर्मप्रचारासाठी यात्रांना प्रारंभ केला. आसामपासून काश्मीरपर्यंत त्यांनी समाजात सहिष्णुता, सत्य आणि अहिंसेचा संदेश पोचविला. त्यांनी ११६ पद्यांची रचना केली असून त्यात वैराग्य, क्षमा आणि मानवतेचा उत्कृष्ट आविष्कार दिसतो. ही पद्ये पुढे गुरु ग्रंथसाहिबात समाविष्ट झाली.
त्याग आणि शौर्याची परंपरा : १७ व्या शतकात समाजावर अन्याय आणि अत्याचारांचे सावट होते. अशा काळात गुरु तेगबहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन अर्पण केले. दिल्लीतील चांदणी चौकात त्यांनी बलिदान दिले. त्यांच्या या त्यागामुळे भारतीय समाजात एकतेची भावना दृढ झाली. त्यांच्या शहिदीनंतर दिल्लीतील सीसगंज गुरुद्वारा आणि रकाबगंज गुरुद्वारा हे स्मारक स्थळे उभी राहिली. ही स्थळे आजही त्याग, शौर्य आणि श्रद्धेची प्रेरणा देतात.
समाजाचे योगदान : गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या संघर्षात सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी समाज यांसारख्या अनेक घटकांनी मोलाची भूमिका बजावली. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाल यांनी गुरुजींसाठी प्राणार्पण केले. या समाजांनी सेवाभाव, साहस आणि श्रद्धेची परंपरा पुढे नेली.
महाराष्ट्रातील कार्यक्रम : गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या शहिदीच्या ३५० व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. नागपूर येथे ७ डिसेंबर २०२५ रोजी सुरेश चंद्र सुरी मैदानावर सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात भारतीय डाक विभागामार्फत विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. सिंधी आणि पंजाबी समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या शस्त्रांची प्रदर्शनी लावण्यात आली. विविध समाज घटक एकत्र येऊन हा ऐतिहासिक समागम साजरा करण्यात आला.
नागपूरनंतर २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये मुंबई येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संदेश आणि प्रेरणा : गुरु तेगबहादुर साहिबजी यांनी दिलेला संदेश हा धार्मिकतेपलीकडे जाऊन मानवतेचा आहे. त्यांनी समाजात सहिष्णुता, एकता आणि स्वातंत्र्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या बलिदानाने भारतीयांना स्वधर्म आचरण्याचा आणि मानवी मूल्ये जपण्याचा आदर्श दिला. आजच्या काळात त्यांच्या विचारांची आठवण समाजाला एकत्र आणते. विविध प्रबोधनपर उपक्रमांद्वारे त्यांच्या त्यागाची शिकवण घराघरांत पोहोचविणे हेच या कार्यक्रमांचे उद्दिष्ट आहे. ‘
हिंद दी चादर’ गुरु तेगबहादुर साहिबजी यांचे जीवन हे त्याग, शौर्य आणि मानवतेचे प्रतीक आहे. त्यांच्या शहिदीच्या ३५० व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने आखलेले कार्यक्रम समाजात एकतेचा, सहिष्णुतेचा आणि मानवतेचा संदेश पोहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड येथील कार्यक्रमांमधून त्यांच्या कार्याचा परिचय जनतेला होणार असून भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
