सोलापूर दि. 30 : राजकारण आणि पत्रकारिता हे डॉ. रवींद्र चिंचोलकर यांचे पुस्तक राजकारण आणि पत्रकारितेच्या क्षेत्राचे चांगले विश्लेषण करणारे आहे. विद्यार्थी तसेच राजकीय क्षेत्रातील लोकांनी आवर्जून वाचावे व विविध विद्यापीठांच्या अभ्यासकमासाठी निवडले जावे असे मत, भारत सरकारचे माजी गृहमंत्री सुशीपकुमारजी शिंदे यांनी व्यक्त केले .
सोलापूर येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुशीलकुमारी शिंदे बोलत होते.
प्रमुख वक्ते म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुधीर गव्हाणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत येळेगावकर, पुस्तकाचे लेखक डॉ रवींद्र चिंचोलकर, राजकीय विश्लेषक राजा माने, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलगुडे तसेच संभाजीनगर येथील विद्या बुक पब्लिशर्सचे शशिकांत पिंपळापुरे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की डॉ . चिंचोलकर यांच्या पुस्तकात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय पत्रकारितेचा आढावा घेतलेला आहेच . याशिवाय पत्रकारिता कशी असावी, राजकारणात कोणते बदल घडायला हवेत यावरही भाष्य करणारे आहे.
प्रा .सुधीर गव्हाणे म्हणाले की पूर्वीच्या काळात राजकीय क्षेत्रात ‘गुन्हेगारी पाश्वभूमी असलेल लोक कमी होते. आता टे प्रमाण वाढत चालले आहे. राजकीय लोक, धनवान, गुन्हेगार आणि निवृत्त सनदी अधिकारी एकत्र येऊन लोकशाहीची वाट लावत आहेत. अशावेळी सर्वसामान्य माणसाची व पत्रकारांची भूमिका वाढते. निकोप लोकशाही निर्माण होण्यासाठी सामान्य माणसाने राजकारणाकडे सजगपणे पाहिले पाहिजे. डॉ चिंचोलकर यांचे पुस्तक महत्वपूर्ण असून त्याचे हिंदी व इंग्रती भाषेतही भाषांतर होण्याची गरज आहे.
पुस्तकाचे लेखक डॉ.रवींद्र चिंचोलकर म्हणाले की, पत्रकारितेत बदल घडविण्याची शक्ती आहे. सोलापुरातील पत्रकारांनी मिरवणुकातील डॉब्लीचा वापर बंद करण्याबाबत जागरूकता निर्माण केली त्यामुळे त्या कार्यास यश मिळाले. तरुणांनी राजकारणाचा तिटकारा न करता चांगले राजकीय नेते होऊन पुढे यावे. पत्रकारितेने राजकारणावर अंकुश ठेऊन त्याला योग्य दिशा देण्याचे कार्य करावे. साप्ताहिक महाराष्ट्रचे माजी संपादक सुनील पाटील म्हणाले की राजकारण आणि पत्रकारिता हे डॉ. चिंचोलकर यांचे पुस्तक राजकारण, पत्रकारिता, जनसंपर्क, समाजकारण यासंदर्भात समर्पक भाष्य करते. आजच्या काळात या पुस्तकाची गरज होती .
अध्यक्षीय भाषणात प्रा. श्रीकांत येळेगावकर म्हणाले की सोलापूर जिल्हयात अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांच्यापासून लढावू पत्रकारांची परंपरा चालत आलेली आहे. पत्रकारिता अनेकदा एकच बाजू दाखविते हे चुकीचे आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनीही आपण देशाचे कार्य करतो याचे भान राखण्याची गरज आहे.
प्रारंभी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजा माने यांनी डॉ. चिंचोलकर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला. डॉ. चिंचोलकर यांनी सोलापुरात पत्रकारांची पिढी घडविली असेही ते म्हणाले. मुद्रित ते डिजिटल पत्रकारिता या प्रवासात पत्रकारितेत मोठे बदल घडल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष पवार यांनी केले. मान्यवराचा सत्कार यावेळी झाला सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते लेखक डॉ . चिंचोलकर आणि प्रकाशक पिंपळापुरे यांचा सत्कार करण्यात आला. आभार डॉ . अंबादास भासके यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पत्रकार, नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
